आटपाडी तालुक्यातील सर्व निवडणुका लढविण्याचा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा निर्धार

विधानसभा निवडणुकीमध्ये वैभव पाटील यांना अपयशाला सामोरे जावे लागले. आटपाडीत वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांनी टीकास्त्र सोडले. यावेळी वैभव पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जनतेच्या मनातील अनेक प्रश्न घेऊन मैदानात उतरलो होतो. मतदारांनी तसेच जनतेने आम्हाला भरपूर साथ देखील दिली. त्यांनी विश्वास आमच्यावर दाखवला. मात्र ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने विरोधकांनी विजय मिळवला.

या ईव्हीएम विरोधात देशातील अनेक पक्ष, संघटना रस्त्यावर उतरले आहेत. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत. काम करत असताना विवेचन व विश्लेषण न करत बसता आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वतंत्र निवडणुका लढवल्या जाणार आहेत.

पंचायत समिती,आटपाडी नगरपरिषद,जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विकास सोसायटी या निवडणुकीला पुन्हा एकदा आम्ही सक्षमपणे सामोरे जाणार आहोत. तसेच आम्ही आटपाडी तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला जरी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तरी आम्ही तो संघर्ष करणार आहोत असे विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.