आष्ट्यात कामगार पुरविण्याच्या बहाण्याने चक्क 17.50 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

सध्या अनेक माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक जण या फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेला देखील आहे. असाच फसवणुकीचा प्रकार आष्टा शहरात उघडकीस आलेला आहे. चक्क १७.५० लाखांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. ऊसतोड कामगार पुरविण्याच्या बहाण्याने ऊसतोड टोळी मुकादमाने आष्टा येथील एका शेतकर्‍याची 17.50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आष्टा येथील तानाजी सूर्यवंशी हे ऊसतोड वाहतूक करण्याचा व्यवसाय करतात. संशयित ईश्वर चव्हाण याने त्यांना 2023-24 या सालासाठी ऊसतोड कामगारांच्या सात जोड्या पुरविण्याचे आश्वासन दिले होते.

याबदल्यात त्याने तानाजी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 17 एप्रिल 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वेळोवेळी 17 लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे ऊसतोड कामगार न पुरवता ईश्वर चव्हाण याने तानाजी यांच्या रकमेचा अपहार केला. तसेच आर्थिक नुकसान करून फसवणूक केली. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ईश्वर भारत चव्हाण (वय 26, रा. पाचेगाव जोरीरुरल, ता. गेवराई, जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी तानाजी शिवाजी सूर्यवंशी (वय 56, रा. आष्टा शिंदे चौक) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.