सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पाण्याच्या टंचाईला येथील जनतेला सामोरे जावे लागते. सरकारच्या अनेक योजनांमधून देखील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक गावात सामूहिक श्रमदानातून पाणलोट चळवळ निर्माण व्हावी या उद्देशातून केंद्र सरकारने राज्यातील ३० जिल्ह्यात पाणलोट यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडी, माढा, मंगळवेढा तसेच सांगोला या चार तालुक्यात लवकरच पाणलोट यात्रा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
या यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमोल जाधव, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद एस. एस. पारशे, उपविभागीय अधिकारी भीमा पाटबंधारे विभाग एस. डी. हलकुडे, प्रकल्प संचालक नेहरू युवा केंद्र अनिल हिंगे, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वाय.चौधरी, उपकार्यकारी अधिकारी सोलापूर पाटबंधारे विभाग ओ. बी. थंबद, प्रांत अधिकारी माढा पी.व्ही. आंबेकर आदी उपस्थित होते