सध्या अनेक भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याचे चित्र दिसतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेलेच आहे. खून, मारामारी, चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असतानाच अलीकडे सांगोला तालुक्यात महिला तसेच महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड काढण्याच्या प्रकरणात दिवंसेदिवस वाढ होऊ लागली आहे. शाळा महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या मुलींची छेडछाड करणाऱ्या टोळया वाढत असून दारु, गांजा यासारख्या अमली पदार्थाचे सेवन करुन मुलीसह पालकांना धमकाविण्याचे प्रकार सातत्याने घडत असुन या गोष्टीकडे सांगोला पोलीस प्रशासन दुर्लक्ष करित आहे.
सांगोला शहर व तालुक्यातील महिला, महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओंचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच सांगोला तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांचे हाल होत असून चोऱ्या, छेडछाड, मारहाण यासह खुनाचे गंभीर प्रकार तालुक्यात वाढत असल्याने नागरिकामध्ये प्रचंड भितीचे वातावरण तयार झाले आहे.
शाळा, महाविद्यालय यांनी वारंवार पोलीस प्रशासनाला माहिती देऊन देखील पोलीस कसल्याही प्रकारची गंभीर दखल घेत नसल्याने पोलीस प्रशासना विषयी विश्वासार्हता कमी झाली असुन मुलींना शाळेत जाणे सुरक्षित वाटत नाही अशा प्रकारच्या सांगोला तालुक्यातील अनेक समस्यांचा जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांना लक्ष घालण्याची मागणी सांगोला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.अभिषेक कांबळे यांनी निवेदन देऊन केली.