खानापूर आटपाडी मतदारसंघातून आमदार सुहास भैय्या बाबर यांची आमदार पदी निवड झाली. त्यांनी आमदारकी पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर आढावा बैठकीचा धडाका लावलेला आहे. नुकतीच त्यांनी विटा पालिकेची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी यावेळी शिक्षण, पाणी, आरोग्य, वाहतूक पार्किंग याविषयी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
विटा पालिकेत प्रशासन नियोजन शून्य कारभार करत असल्याचे सांगत आमदार बाबर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराला जबाबदार कोण असा सवाल आता नागरिकांतून विचारला जातोय. गेल्या तीन वर्षापासून पालिकेत प्रशासक राज आहे म्हणजेच प्रशासनावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आता शासनाचीच म्हणजेच त्या त्या विधानसभा क्षेत्रातील आमदारांचीच आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात पालिकेतील प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार सुधारण्यासाठी विद्यमान आमदार सुहास भैया बाबर यांनी काय प्रयत्न केले हे पाहणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे गेली 50 वर्षे विटा नगरपालिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या पाटील कुटुंबातील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सुस्तावलेल्या प्रशासनाला जाब का विचारला नाही असे प्रश्न नागरिकांतून विचारले जात आहेत. त्यामुळे पालिकेचा कारभार नियोजन शून्य आहेत पण त्याला जबाबदार कोण हे देखील स्पष्ट होणे गरजेचे आहे