आ. सुहास बाबर यांच्या मागणीला यश; राजेवाडी तलावातील पाणी मिळण्याचा अडथळा दूर 

राजेवाडी तलावातील जलसेतूचे काम पूर्ण होत नसल्यामुळे पुजारवाडी, पांढरेवाडी, दिघंची आणि उंबरगावला पाणी मिळत नव्हते. आ. सुहास बाबर यांनी हिवाळी अधिवेशनात रखडलेल्या जलसेतूच्या कामाचा औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. अधिवेशनात त्यांनी रखडलेल्या जलसेतूचा कामातील अडथळा दूर करण्याची मागणी केली. या जलसेतूच्या कामास गती देऊन संबंधित ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. त्यानंतर जागे झालेल्या संबंधित ठेकेदाराने तत्काळ काम सुरू केले. कामाला गती देऊन नुकतेच काही दिवसांत काम पूर्ण होणार आहे.

नंतर या जलसेतूमधून राजेवाडी तलावाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे आटपाडी तालुक्यातील त्या गावातील शेतक-यांचा शेतीबाबत पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजेवाडी तलावाच्या पाण्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला होता. तसेच आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, दिघंची, पुजारवाडी, पांढरेवाडी आणि उंबरगाव भागातील शेतक-यांना होतो.

मात्र जलसेतू नसल्यामुळे पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन आ. अनिलभाऊ बाबर यांनी प्रयत्न करून जलसेतूसाठी निधी आणला. मात्र काम करणा-या संबंधित ठेकेदाराने कामाकडे दुर्लक्ष केले. काही ठिकाणी किरकोळ स्वरूपात काम केले. तरीही शेतक- यांना पाणी देण्यासाठी त्याचा उपयोग होत नव्हता. आ. सुहास बाबर यांनी उरमोडी ते कटापूर योजनेतून पुराचे वाहून जाणारे पाणी राजेवाडी तलावात आणले होते.