इस्लामपूर येथील बावची रस्त्यावरील ऊसाला गुरुवारी ९ जानेवारी रोजी लागलेल्या आगीत सुमारे ७० ते ७५ एकर ऊस जळून खाक झाला. महावितरणच्या विजेच्या तारेतून ठिणग्या पडत होत्या, त्यामुळे ऊसाने पेट घेतला असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या भागात हुतात्मा साखर कारखान्याला जाणारा आडसाली ऊस होता. हुतात्मा कारखान्यांची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वाऱ्यामुळे आग भडकतच राहिली. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या आगीत महावीर मगदूम व शितल मंगदूम यांच्या द्राक्ष बागेचे ही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी विजवीतरण कंपनी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या या नुकसानामुळे हळहळत व्यक्त होत आहे. या आगीत शालिवाहन मगदूम, गुंडा मगदूम, महावीर बबन मगदूम, रायगोंडा पाटील, चौगौडा पाटील, महादेव भिलार, रघुनाथ भिलार, भीमराव पाटील, मनोज पाटील, बबन पाटील, रावसाहेब पाटील, शामराव एडके, गुंडा मरळे, अमर झेंडे, अनिल पाटील, सुनील पाटील, सुनील मगदूम, श्रीकांत मगदूम, प्रकाश भूपाल होरे या शेतकऱ्यांचा ऊस जळून व द्राक्षबागेला झळ बसून लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्नीशामन दलाची गाडी आत जाऊ शकत नसल्यामुळे सायंकाळपर्यंत आग धुमसत होती. आगीत जळालेल्या ऊसामध्ये जास्त क्षेत्र हे आडसाली ऊसाचे होते. हा ऊस वेळेत कारखान्याने नेला असता तर आमचे हे लाखो रुपयांचे नुकसान झाले नसते. आधीच ऊसशेती परवडत नाही त्यात आता जळका ऊस म्हणून टनाला ३०० ते ४०० रुपये कमी केले जाणार. हे नुकसान वेगळेच होणार आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.