रेंदाळ येथे मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्पाचा शुभारंभ, ग्रामपंचायत प्रशासन राहणार कटीबद्ध

सरकारतर्फे अनेक नवनवीन योजना राबविल्या जातात. ज्याचा शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना पुरेपूर लाभ देखील होतो. सध्या तर शेतकऱ्याच्या सोयीसाठी शासनाने अनेक नवनवीन योजना आणल्या आहेत. त्यांचा शेतकरी लाभ देखील घेत आहेत. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे महाराष्ट्र सरकारच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या चार मेगावॉटच्या मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्पाचा शुभारंभ शेतकरी दत्तात्रय पाटील यांच्या शुभ हस्ते व लोकनियुक्त सरपंच सुप्रिया भरत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

राज्य सरकारच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री कृषी सौर प्रकल्प योजना साकारण्यात येणार आहे. हातकणंगले तालुक्यासाठी रेंदाळ गावातील गायरानातील २५ एकर जागेवर हा प्रकल्प होणार आहे. यावेळी, लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील म्हणाल्या की, या प्रकल्पासाठी रेंदाळ ग्रामपंचायत प्रशासन शासनाला सर्वतोपरी सहकार्य करत असून गावसभेत सुध्दा याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

तसेच, आगामी काळात शेतकऱ्यांना यातून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कटीबद्ध राहील. यावेळी, महिला व बालकल्याण सभापती दया पाटील, दिवाबत्ती सभापती उषाताई चौगुले, आरोग्य सभापती देवकी विभुते, ग्रामपंचायत सदस्या अन्नपूर्णा गळदगे, पल्लवी पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय चौगुले, उदय विभुते, भरत पाटील, दत्तात्रय पाटील, विक्रम जगदाळे आदी उपस्थित होते.