आमदार जयंत पाटील यांची पुढची राजकीय दिशा काय? राष्ट्रवादीसाठी राहणार चिंतेचा विषय….

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत पक्षसंघटनेची नव्याने बांधणी करणे, महाविकास आघाडीतील घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात पक्षाच्या सात खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी दिलेल्या ‘ऑफर’ची चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार जयंत पाटील सात वर्षे कार्यरत आहेत. राज्यात पक्ष बांधणीसाठी त्यांनी मेहनत घेतली आहे.

मात्र योग्यवेळी संघटनेत फेरबदल करणे असो की जुन्या नव्यांचा मेळ घालणे यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी उचलून धरतानाच, वेळ देणारा आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणारा प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी केली आहे. पाटील यांना बदलण्याची आग्रही मागणी रोहित पवार यांनी सतत लावून धरली होती. त्यामुळे जयंत पाटील यांना पायउतार व्हावे लागण्याची मोठी शक्यता आहे. जर असे झाले तर पाटील यांची पुढची राजकीय दिशा काय? हा राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय राहणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दुसऱ्यांदा फूट पडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. यातच विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जर पदावरून बाजूला केले तर त्यांची भूमिका काय राहणार.हा देखील चिंतेचा विषय बनू शकतो.