वाकुर्डे सिंचन योजनेचे पाणी ऐतवडे बुद्रुकमध्ये

प्रत्येक भागात पाण्याचा प्रश्न जाणवतोच. पण अलीकडे पाणी टंचाईवर सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जातात. ज्यामुळे नागरिकांच्या पाणी प्रश्नांवर दिलासा मिळत आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी खिरवडे व हत्तेगाव येथील पंप आज सुरू करण्यात आले. त्यामुळे लवकरच ऐतवडे बुद्रुक व परिसरात पाणी येणार असून ३० तारखेला करण्यात येणारे टाळे ठोक आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती राजारामबापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड यांनी दिली. 


ऐतवडे बुद्रुक, कार्वे, ढगेवाडी शिवपुरी, वाघवाडी, जकराईवाडी व परिसरातील तलाव आणि ओढ्यामध्ये वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावी. यासाठी शहाजी गायकवाड यांनी ३० तारखेला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, सांगली येथे पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी व आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे नेते सम्राट महाडिक, संबंधित गावातील शेतकरी यांची बैठक होऊन तातडीने पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने हत्तेगाव व खिरवडे येथील वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पंप सुरू करण्यात आले. त्यामुळे ऐतवडे बुद्रुक व परिसरात लवकरच पाणी येणार असल्यामुळे आंदोलन स्थगित केल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.