रांगोळी ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहिम हाती घेऊन नियमित गटार स्वच्छता व फवारणी करण्याची नागरिकांमधून मागणी…..

अलीकडच्या काळात आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. अनेक भागात अस्वच्छतेमुळे अनेक आजार उदभवू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून वेळोवेळी स्वच्छतेची मागणी होऊ लागली आहे. सध्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील सोसायटी कॉर्नर या ठिकाणी नागरिक सध्या गटारीतील अस्वच्छतेच्या समस्येला तोंड देत आहेत. ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास तर होत आहेच, शिवाय डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गटारीत साचलेल्या घाणीमुळे येथील परिसरात दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांना नित्य व्यवहार करतानाही त्रास होत आहे. डासांचा उपद्रवही वाढला आहे. यामुळे ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार स्वच्छतेची मागणी केली  आहे. मात्र अद्याप या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही. ग्रामपंचायतीनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गटारीतील घाण साफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच, नियमित स्वच्छता मोहिम राबवून गटारी स्वच्छ ठेवाव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे. गावातील अनेक नागरिकांनी या परिस्थितीमुळे आरोग्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे आम्ही त्रस्त आहोत. डासांचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

गावातील या बिकट परिस्थितीमुळे ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहिम हाती घ्यावी, नियमित गटार स्वच्छता व फवारणी करून नागरिकांना डासांचा त्रास कमी करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामपंचायतीने तातडीने योग्य पावले उचलली नाहीत तर नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.