सध्या सरकारतर्फे अनेक विविध योजना राबविल्या जात आहेत. ज्याचा पुरेपूर लाभ देखील घेतानाचे चित्र देखील दिसतच आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे अनेकविध योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ग्रीस्टॅक ( डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एग्रीकल्चर) ही योजना पारदर्शकपणे राबविण्याचा आदेश तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिला आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जाहीर झाल्यामुळे या कामी कोणत्याही अधिकाऱ्याने दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना बेल्हेकर यांनी आदेशाद्वारे दिली आहे.
हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती व शेताचे भू संदर्भिकृत संच एकत्रित तयार करणे व ते सातत्याने अद्यावत करणे करिता ग्रीस्टॅक योजना काम करणार आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुलभ, पारदर्शक पद्धतीने व वेळेवर उपलब्ध होण्यासाठीच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त दराने कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा विपणन व्यवस्था निर्माण करुन देण, स्थानिकांनी विशिष्ट तज्ञांचे मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती व प्रवेश मिळवून देणे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व अत्यंत सोपी पद्धत विकसित करणे राज्यातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनाच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे. शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेचा डेटा व ग्रीटेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना राबविणे.
वरील प्रमाणे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी गाववार जाऊन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सदर गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी गावातील कार्यरत असलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरचे केंद्र चालक यांची मदत घेऊन त्यांचे आयोजन करण्याची सूचना तहसीलदार बेल्हेकर यांनी दिली आहे.
तसेच योजनेबाबत निवडलेल्या गावांमध्ये नियोजित करण्यात आलेल्या कॅम्प मध्ये शेतकऱ्यांचे शेती ओळखपत्र (फार्मर आयडी) तयार करून त्याचा दैनंदिन अहवाल व त्यांचे फोटो तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे सादर करण्याचे आदेश बेल्हेकर यांनी दिले आहेत.