डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा मोठा निर्णय…..

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या वादग्रस्त निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपल्या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंचांच्या निर्णयामुळे मला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पंच कमिटीने माझ्या पराभवाच्या कारणांची दखल घ्यावी, अन्यथा येत्या दोन दिवसांत मी माझ्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करेन, असे चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले आहे.

शिवराज राक्षेला पंचांनी लाथ मारल्याच्या घटनेवर बोलताना, पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असे वादग्रस्त विधान चंद्रहार पाटील यांनी केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगली जिल्ह्याला मी २८ वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. ३५ वर्षांनंतर मी डबल महाराष्ट्र केसरी झालो. तोपर्यंत कुणीही डबल महाराष्ट्र केसरी नव्हते. ट्रिपल महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा मी पहिलाच पैलवान होतो, असंही त्यांनी सांगितलं.

इतिहासात असे कधीच घडले नव्हते. परंतु आज जसा शिवराज राक्षेवर अन्याय झाला, तसाच अन्याय माझ्यावरही झाला होता. ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना मला जाणीवपूर्वक हरवण्यात आलं, असा आरोप चंद्रहार पाटील यांनी केला आहे.