आटपाडी येथील सांगोला चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बेकायदेशीर बसवलेला पुतळा काढल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी ४७ जणांवर आटपाडी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.उपनिरीक्षक सागर खाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. येथील सांगोला चौकात शनिवारी पहाटे चौथरा उभारून डॉ. आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवला होता.
त्यानंतर दिवसभर आंबेडकरप्रेमी पुतळ्याशेजारी बसून होते. त्या वेळी पोलिस उपाधीक्षक विपुल पाटील, प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन रीतसर परवानगी काढून पुतळा बसविण्याची विनंती केली.
रविवारी पहाटे सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस संरक्षणात पुतळा काढला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरप्रेमींनी सांगोला चौकात चार तास रास्ता रोको केला. तसेच पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. सायंकाळी पुन्हा दुसरा पुतळा बसवला. आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी दुसरीकडे वळवली होती. दरम्यान तिसऱ्या दिवशी ४७ जणांवर आटपाडी ठाण्यात गुन्हा दाखल केला.