सध्या अलीकडच्या काळात अनेक गुन्हेगारी म्हणजेच खून, मारामारी, तसेच अवैध धंदे या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसतच आहे. अनेक छोट्या मोठ्या कारणांवरून अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. असाच एक प्रकार इचलकरंजीत उघडकीस आलेला आहे. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा कोयत्याने चेहर्यावर, गळ्यावर व मानेवर वर्मी घाव घालून खून केल्याची घटना (शुक्रवार) उघडकीस आली.
सौ. मनिषा दिलीप धावोत्रे (वय 40 रा.स्वामी मळा) असे मृत महिलेचे नांव आहे. तर पती दिलीप मनोहर धावोत्रे (वय 45) हा घटनेनंतर स्वत:हून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मनिषाचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे (रा.ओगलेवाडी ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, स्वामी मळा परिसरात राहणार्या दिलीप धावोत्रे याचा सन 2010 मध्ये ओगलेवाडी येथील मनिषा हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत.
धावोत्रे पती-पत्नी हे दोघेही कोरोची येथील कारखान्यात वहिफणीचे काम करीत होते. दिलीप हा पत्नी मनिषा हिच्यावर वारंवार चारित्र्यावरुन संशय घेत होता. त्यातूनच त्यांच्यात वाद होऊन दिलीप हा मनिषाला मारहाणही करीत होता. मुलांनाही मारहाण करुन त्रास देत असल्याने काही वर्षांपासून दोन्ही मुले कराड येथे मावशीकडे शिक्षणासाठी जावून राहिले होते. मनिषा हिने पतीकडे दारू सोडण्यासाठी तगादा लावला होता. दोन दिवसांपूर्वी दिलीप हा पंढरपूर येथे दारु सोडण्याचे औषध आणण्यासाठी गेला होता. तो बुधवारी परतला.
गुरुवारी रात्री दिलीप आणि मनिषा यांच्यात पुन्हा वाद झाल्याची शक्यता आहे. त्यातूनच मनिषा ही झोपली असताना पहाटेच्या सुमारास दिलीप याने अत्यंत निर्दयीपणे कोयत्याने मनिषाच्या चेहरा, गळा व मानेवर वर्मी वार केले. आठपेक्षा अधिक वर्मी वार झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. खूनानंतर दिलीप हा स्वत:हून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने पत्नीचा खून केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसही हडबडून गेले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सचिन पाटील यांच्यासह पथकाने धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.