सध्या अनेक भागात काही ना काही सुविधांचा अभाव हा असतोच . यासाठी अनेकवेळा मागणी देखील केली जाते. पण यावर काही वेळा दुर्लक्ष केले जाते आणि मागण्या अपूर्णच राहतात. महावितरण कंपनीने राज्यातील विविध वीज ग्राहकांच्या २०२४- २५ ते २०२९-३० या कालावधीच्या वीज दरवाढीस मंजुरी मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या प्रस्तावाद्वारे वीजदर कमी करीत असल्याचा फसवा प्रचार केला असला तरी या प्रस्तावाचा सखोल अभ्यास केला तर महावितरणने पुन्हा एकदा वेगवेगळ्या मार्गाने दरवाढच प्रस्तावित केली आहे, असा आरोप विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी केला आहे.
किरण तारळेकर म्हणाले, राज्यातील विविध वीज ग्राहक संघटना, औद्योगिक संघटना यावर हरकती नोंदवण्याची तयारी करत आहेत. सर्वसामान्य नागरीक व वीज ग्राहकांनाही मोठ्या संख्येने या प्रस्तावास आक्षेप घेऊन विरोध दर्शविणे आवश्यक आहे. अन्यथा देशात सर्वाधिक महाग वीजदर असलेल्या आपल्या राज्यात पुन्हा एकदा वीजदरवाढ लादली जाईल. या प्रस्तावावर १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ग्राहक हरकती नोंद करु शकतात व विभागीय सुनावणी मध्ये उपस्थित राहुन समक्ष बाजू मांडता येईल. विटा यंत्रमाग संघाने आपला हरकत अर्ज नियामक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केला असुन मुख्यमंत्री, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांना मेलद्वारे हरकत अर्ज सादर करुन सदर प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
आपल्या राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत पहिलेच वीज दर सर्वाधिक आहेत ही गोष्ट लक्षात घेऊन आयोगाचा सदरचा वीज दर वाढ प्रस्ताव नाकारावा व आपले दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी कसे होतील यासाठी कार्यक्षम भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी नियामक आयेगाने नियंत्रण आणावे अशीही मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सदस्य किरण तारळेकर यांनी केले आहे.