हिंगणगावच्या तलाठी कार्यालयाच्या भिंतीना तडे गेल्याने नूतन तलाठी कार्यालयाची मागणी, आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज

काही विकासकामे सुरु आहेत. तर अनेक भागात विकासकामांचा अभाव देखील आहे. नागरिकांच्या अनेक विविध मागण्या असतात. वेळोवेळी या मागण्या पूर्ण करण्याची मागणी देखील केली जाते. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथील तलाठी कार्यालयाच्या भिंतीवरती बरीच वर्षे झाले झाड उगवल्याने त्या झाडाच्या मुळ्या तलाठी कार्यालयाच्या भिंतीत गेल्याने जशी जशी त्या झाडाची वाढ होईल. तशी तशी तलाठी कार्यालयाच्या भिंतीत मुळे शिरल्याने तडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या तलाठी कार्यालयामध्ये असणारे तलाठी कोतवाल तसेच कामासाठी येणारे नागरिक हे जीव मुठीत घेऊन काम चालत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नूतन तलाठी कार्यालयाची मागणी अधिकारी नागरिक यांच्यातून होत आहे. 

तलाठी कार्यालयाची परिस्थिती पाहता विद्यमान सरपंच दीपक पाटील यांनी नूतन कार्यालयासाठी प्रस्ताव महसूल मंत्री ग्रामविकास मंत्री पाठवला होता परंतु संबंधित प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही किंवा तशा पद्धतीचे पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त  झालेले नाही. अगोदरच्या माजी सरपंच शीला पाटील यांनीही या नूतन कार्यालयासाठी प्रयत्न केला होता परंतु तेव्हाही वरिष्ठ प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही संबंधित वरिष्ठ प्रशासन हिंगणगाव तलाठी कार्यालयाची भिंत पडून जीवितहानी झाल्यानंतर जागे होणार आहे का असा सवाल नागरिकांतून होत आहे.

आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींनी सुद्धा हिंगणगावच्या या तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तर तलाठी कार्यालयाची भिंत कोसळून जीवित हानीची घटना होण्याअगोदर संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर ग्रामपंचायतीने पाठवलेल्या प्रस्तावाची दखल घेऊन नूतन तलाठी कार्यालय उभे करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे..