इस्लामपूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात वीसजण जखमी

सध्या अनेक भागात पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद खूपच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इस्लामपूर शहरात बुधवारी सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. शहरात विविध ठिकाणी या कुत्र्याने 15 ते 20 जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले.11 जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.त्यामध्ये 4 व 8 वर्षांची दोन मुले, एक महिला, 8 पुरुषांचा समावेश आहे. नगरपालिकेचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत त्या कुत्र्याचा शोध घेत होते. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोमीन मोहल्ला परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने एकाचा चावा घेतला.

तेथून पुढे लाल चौक, गांधी चौक, यल्लमा चौक, मटण मार्केट परिसर आदी ठिकाणी कुत्र्याच्या समोर जो कोणी येईल त्याच्या अंगावर कुत्रे धावून जात होते. कुत्र्याने 15 ते 20 जणांचा चावा घेतला. पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती मिळताच पालिकेच्या कर्मचार्‍यांनी कुत्र्याला पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली. तासाभराच्या कालावधीत कुत्रे 15 ते 20 जणांना चावल्याने शहरात खळबळ उडाली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

नंतर पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कुत्रे सापडले नाही. ते नवेखेड रस्त्याला गेल्याचे काही नागरिकांनी पाहिले. पिसाळलेले कुत्रे शहरात फिरत असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, कुत्र्याची माहिती नगरपालिकेला द्यावी, असे आवाहन पालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी केले आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांनी, डुकरांनी उच्छाद मांडला आहे. कुत्र्याच्या झुंडीच्या झुंडी फिरत आहेत. वाहनांतून भटकी कुत्री आणून शहरात सोडली जात आहेत. कुत्र्यांचे नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. पालिकेने तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी प्रतिक्रीया माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.