शहापूर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलनाचा ठाकरे गटाचा आयुक्तांना इशारा

अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. वेळोवेळी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे या खराब रस्त्यांमुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. इचलकरंजी शहरात देखील अनेक रस्ते खराब झालेले आहेत. इचलकरंजीतील शहापूर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. येत्या पंधरा दिवसात रस्त्यांचे डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा इचलकरंजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने एका निवेदनाद्वारे आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, डेक्कन कॉर्नर चौक ते दत्त मंदिर, आंबेडकर नगर ते यशवंत विद्यामंदिर, धनगर माळ ते शहापूर चौक म्हसोबा मंदिर पर्यंतचा रस्ता उखडलेला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत.

त्यामुळे सदर रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. तसेच वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये शहापूरचे ग्रामदैवत श्री म्हसोबा यात्रा आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये सदर रस्त्याचे हॉट मिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदनावर शहर प्रमुख सयाजी चव्हाण, महेश बोहरा, बैभव उगळे, आनंद शेट्टी, मनोज भाट, शिवाजी पाटील, धनाजी मोरे, सागर जाधव आदी पदाधिकारी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.