आ. राहूल आवाडे यांनी उत्पन्नाचे दाखले देणे बंद केलेल्या तलाठ्यांचीही घेतली झाडाझडती

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत शनिवारी आमदार राहुल आवाडे यांनी अप्पर तहसिलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, संगांयो समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या, सदस्य कोंडीबा दवडते, महेश पाटील, सुखदेव माळकरी, संजय नागरे, महेश ठोके, सलीम मुजावर, भगत यांच्यासह माजी नगरसेवक संजय केंगार तसेच पाच गावातील तलाठी, सर्कल, संगांयो कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. केवळ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतच खाते उघडण्याची सक्ती न करता शासनाच्या अध्यादेशानुसार संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे त्याच्या सोयीच्या बँक खात्यात अनुदान जमा करावे, अशा सूचना करताना आमदार राहुल आवाडे यांनी दोन महिन्यांपासून उत्पन्नाचे दाखले देणे बंद केलेल्या पाचही गावातील तलाठ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

गोरगरीब लाभार्थ्यांना कोणत्याही शासकीय योजनांपासून वंचित ठेवू नका असे सांगत सर्वांनी मिळून एक टीम वर्क करुया, असे आवाहनही त्यांनी केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने डीबीटीच्या माध्यमातून तुम्ही कार्यरत रहा. त्यासाठी उत्पन्न दाखले देण्याचे काम तातडीने पूर्ववत सुरु करण्याच्या सूचना केल्या. शासनाने थेट डीबीटीद्वारे अनुदानाची रक्कम लाभाथ्र्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनुदान जमा केले जात आहे. परंतु अद्यापही इचलकरंजीतील सुमारे ६ हजार लाभार्थ्यांनी बँक खात्याला आधार लिंक न केल्याने डीबीटीपासून वंचित राहिले आहेत.

इचलकरंजी कार्यालयातून केडीसीसी बँकेतच खाते काढण्याचा आग्रह केला जात असल्याबद्दल बोलताना आमदार आवाडे यांनी, केडीसीसी बँकेतील अपुऱ्या स्टाफमुळे त्याठिकाणी संगांयो लाभार्थ्यांना बराच वेळ तिष्ठत बसावे लागते. लाभार्थी पहाटेपासूनच रांगा लावून बसलेले असतात. शिवाय सर्वच लाभार्थी वयोवृध्द असल्याने त्यांना नाहक त्रास सोसावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार लाभार्थ्याला त्याच्या सोयीनुसार त्याला हवी ती बँक निवडू द्यावी. कोणाही लाभार्थ्याला जिल्हा बँकेची सक्ती करु नये, असे सांगितले.