गुजरात व गोवा येथे भाजप सरकार असताना गाडीच्या नंबर प्लेटचे दर कमी पण महाराष्ट्रात मात्र दर वाढ का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करुन सांगली- इस्लामपूर मार्गावर कामेरी नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. ‘सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’, महायुती सरकारचा निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव पाटील, उद्योजक सुरेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा सुष्मिता जाधव, शहराध्यक्षा पुष्पलता खरात, माजी नगरसेवक आनंदराव मलगुंडे, कारखान्याचे संचालक शैलेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
सुष्मिता जाधव म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य व गोवा राज्यात भाजपचे सरकार असताना गोवा राज्यात दर कमी व महाराष्ट्र राज्यात जास्त आहे. हे सरकार आमच्या राज्यातील जनतेवर सुड घेण्याचे काम करीत आहे. सर्वसामान्य जनतेची प्रचंड लुट करण्याचे काम करीत आहेत. माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, अन्य राज्यात वेगळा दर महाराष्ट्रातील अन्यायकारक दर कमी करुन सरकारने जनतेची लुट बंद करावी. शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी मनोगत व्यक्त केले.