बामणी येथील वाड्यावस्त्यावर जाणूनबुजून पाणी पुरवठा करीत नाहीत. याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी यांनी गावातील नागरिकांसमवेत सोमवार, दि. १० रोजी थेट पंचायत समिती कार्यालय परिसरात उपोषण सुरू केले आहे. पाणी पुरवठा टाकीच्या वॉलजवळ साठलेल्या पाण्यात जंतू पडलेले असून तेच पाणी गावात सोडले जात आहे. गावात बऱ्याच ठिकाणी दिवे बसविलेले नसल्यामुळे बराच भाग अंधारात आहे. बामणी उपसरपंचाचे पद ३ अपत्यामुळे रद्द झाले आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले मानधन जमा करून घ्यावे व त्यांच्यावर कार्यवाही करावी. सध्याचे सरपंच गावच्या विकासाची कोणतीही कामे करीत नसून वित्त आयोगाचा निधी तसाच शिल्लक आहे. हा निधी खर्च झाल्याशिवाय त्यांचे मानधन अदा करू नये.
ग्रामपंचायत गोरगरिबांकडून वसुली करीत आहे. परंतु ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे नातेवाईक यांची ८ ते १० वर्षांची वसुली बाकी आहे. त्यामुळे यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. बामणी ग्रामपंचायतीचा शिल्लक असलेला निधी (ई-टेंडर) किंवा प्रसिद्धी देऊन खर्ची केल्याशिवाय सरपंचाचे मानधन देण्यात येऊ नये, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासह ६-३ असे बहुमत असल्यामुळे इतर सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचाही आरोप प्रत्यारोप केला जात आहे. सुमारे ७० लक्ष निधी शिल्लक आहे, तरीही कामे केली जात नाहीत. याबाबतही उपोषणस्थळी मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मागण्यासंदर्भात उपोषणकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते.