जयंतराव पाटलांकडून महायुतीच्या अर्थसंकल्पाची चिरफाड

सरकारकडे पैसे नाहीत. पैसे कुठून आणणार याचा पत्ता नाही. महसूली तुट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियंत्रण कसे आणणार? या आणि यासारखे प्रश्न आ. जयंतराव पाटील यांनी उपस्थित केले आहेत. लाडक्या बहिणींना २१०० रूपये पुढील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मिळतील असे स्पष्ट करत आ. जयंतराव पाटील यांनी महायुतीच्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली.  तोपर्यंत वेगवेगळे निकष लावले जातील. आता १० लाख महिला बाद झाल्या आहेत. ही संख्या आणखी वाढेल असंही ते म्हणाले. राज्याला आर्थिक शिस्त राहीली नाही असंही पाटील म्हणाले. ती असती तर महसूली तुट दिसली नसती असंही त्यांनी सांगितलं. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होत्या.

पुढच्या १५-२० वर्षात काय करू शकतो त्याचे स्वप्न दाखवण्याचा हा एक चांगला कार्यक्रम होता असं माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांनी सांगितले. पण त्यासाठी गुंतवणूक किती लागणार? पैसे कसे उभे करणार? सरकार कर्ज किती काढणार? हे सांगणं गरजेचं होतं. पण ते काही सांगितलं गेलं नाही. घोषणांना विरोध नाही. पण खर्च किती येणार? हे सांगितलं पाहीजे होतं असं जयंतराव पाटील म्हणाले. विरोधकांच्या वर्मावर बोट सध्याच्या स्थितीत ४५ हजार कोटींपेक्षा जास्त महसूली तूट दाखवली आहे. तर राजकोषीय तुट ही १ लाख ३६ हजार कोटी दाखवली आहे. हे धक्कादायक आहे, असं जयंतराव पाटील म्हणाले.

ही महसूली तूट दीड लाख कोटीपर्यंत जाईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पात किती आकडे वगळले आहेत हे पाहावे लागेल. ते आकडे समोर आल्यानंतर महसूली तूट ही ४५ हजार कोटी वरून ६०-७० हजार कोटींवर जाईल असही ते म्हणाले. ही बाब राज्याच्या दृष्टीने चिंतेची असल्याचं जयंत पाटील म्हणाले. मागिल अर्थसंकल्पात ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यावर पैसे खर्च झालेले नाहीत असं जयंतराव पाटील यांनी सांगितले. काही विभागांना पैसे मिळाले नाहीत. व्याज काढण्याची मुभा सरकारला आहे. पण सरकारने उत्पन्न वाढवण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितले. त्यातून व्याजाचा बोजा कमी येईल. जर तसं झालं नाही तर विकासकामावरिल खर्च हा कमी होतो. त्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होतो. असं ही त्यांनी स्पष्ट केलं.