रेंदाळातील पाईप लाईन दररोज कुठे ना कुठे लिकेज् असते. रेंदाळ बसस्थानकावर पाणीच पाणी झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती दररोज विविध ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जात आहे. जिल्हा प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी हताश होऊन वाट पाहत असतात. आता जुन्या पाईप लाईनची गुणवत्ता खड्ड्यात गेली असून हे थांबविण्यासाठी नवीन एचडी पाईप लाईन करावी अशी जनतेतून मागणी होत आहे. पाणी पुरवठा विभागाने खर्च टाकण्यासाठी काम न करता पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी जनतेची माफक अपेक्षा आहे. तरीही ५ कोटींची योजना रेटून नेली जात आहे.
जॅकवेलपासून उपसा वाढवण्याची गरज आहे. मात्र अधिकारी कळीचा मुद्दा विसरून जलकुंभ बांधत सुटलेले दिसत आहेत याचा टेक्निकल अभियंत्यांने स्थळ पाहणी करून कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. दररोज लिकेज् काढण्याचे काम कुठे ना कुठे सुरू असते. यामुळे पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. भगतसिंग रोड, पंजाब नॅशनल बँक, रामनगरमधील बहुतांश ठिकाणी सातत्याने लिकेज् पहायला मिळते. रेंदाळ जनता मेडिकलच्या दुकानासमोर १५ दिवस पाणी गळती सुरू आहे, तर जैरे यांच्या घराजवळ लिकेज् थांबविण्यासाठी मारलेले बूच निघाल्याने बसस्थानक परिसरात गळती होऊन रस्त्यावर पाणीच पाणी झाले.
गुडघाभर पाणी साचल्याने दुचाकीसह चारचाकी वाहन चालकांची कसरत झाली. यातून रेंदाळ ग्रामपंचायत बोध घ्यायला तयार नाही. जिल्हा प्रशासनाने वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जनतेमधून होत आहे.