इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला येथे कल्लाप्पा आवाडे क्रीडानगरीत आयोजित केलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2024-25 बक्षीस वितरण व निरोप सभारंप प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार व सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी इचलकरंजीला क्रीडासंकुल निश्चितपणे मंजूर करुन देईन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजीकरांना दिला.
इचलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजन केल्याबद्दल आयोजकांची स्तुती केली. तसेच या स्पर्धेला संजीवनी देणारे सर्व क्रीडाप्रेमी, रसिकांचे, सगळ्या टीमचे तसेच त्यांनी तोंड भरून कौतुक केले. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, खो-खो या पारंपरिक खेळाला अधिक मोठ्या व्यासपीठावर नेणाऱ्या कै.भाई नेरूरकर यांचे महाराष्ट्रात खो-खो च्या विकासासाठी दिलेले योगदान अमुल्य आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात खो-खो या खेळाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय स्पर्धेला 25 लाखाची वाढ करुन एक कोटी केली आहे असे त्यांनी सांगितले.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यामध्ये क्रीडा कामगिरीत कोल्हापूर जिल्ह्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, या जिल्ह्याने आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, अनेक खेळाडू, अनेक नामवंत, म्हणजे खाशाबा जाधव पासून ते हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे, गणपतराव आंधळकर, दादू चौगुले, याच भूमीतील ऑलिंपिक जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, टेबल टेनिस खेळाडू शैलेजा साळुंखे, नेमबाज स्वप्नील कुसाळे अशा अनेक खेळाडूंनी या जिल्ह्यामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.