खानापूर तालुक्यातील निसर्ग फाउंडेशनचे कार्य अभिमानास्पद: जिल्हाधिकारी अशोक काकडे

खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने सक्रिय असलेल्या निसर्ग फाउंडेशन लेंगरे या संस्थेचे कार्य अभिमानास्पद आहे. असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रतिपादन केले केले. ते सांगली येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची जिल्हा शल्यचिकित्सक व निसर्ग फाउंडेशनचे कार्यवाह डॉ. विक्रमसिंह कदम व संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निसर्ग फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची पूर्ण माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी निसर्ग फाउंडेशनच्या वतीने राबविलेल्या अनेक उपक्रमांसह रुग्णवाहिका या उपक्रमाचे कौतुक केले. याचा फायद नागरिकांना झाला आहे.

संस्थेने पर्यावरण, जलसंधारण चळवळीत बिया संकलन, अनाथ गरजूंसाठी एक ओंजळ धान्य उपक्रम, माणुसकीची भिंत, स्वच्छता मोहीम, पोसेवाडी येथील पुरातन वस्तूसंग्रहालय, राज्यस्तरीय पुरस्कार, कला, सांस्कृतिक कार्यक्रम, निसर्ग सखी मंच आणि स्वच्छ भारत अभियानात केलेले काम आदर्शवत आहे. संस्थेचे कार्यवाह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व त्यांची सर्व टीम जबाबदारीने व प्रमाणिकपणे लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. संस्थेने असेच नावीन्यपूर्ण उपक्रमामध्ये सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रशासकीय स्तरावर संस्थेला मदत करू, असे सांगितले यावेळी निसर्ग फाउंडेशनच्यावतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा सत्कार करण्यात आला.