हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे गेली अनेक वर्षे छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याची मागणी होती. मात्र प्रशासनाच्या परवानग्या आणि इतर बाबींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होऊ शकत नव्हता. दरम्यान आज शिवप्रेमींनी परवानगी न घेता हा पुतळा बसवला. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने गावभागातील जुन्या बसस्थानकाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहाटेच्या सुमारास चबुतऱ्यासह शिवप्रेमींनी पुतळा बसविला. कोणतीही परवानगी न घेता हा पुतळा बसविल्याने पोलीसांनी तो हटविण्याचा आदेश दिला. यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. तसेच शिवरायांचे गीत आणि घोषणा देत शिवप्रेमींनी परिसर दणाणून सोडला.
शिवप्रेमींनी परवानगी न घेता हा पुतळा बसविल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. यावर पट्टणकोडोली ग्रामपंचायत प्रशासनाने पुतळा देखभालीची जबाबदारी घेतली. प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांनी ज्या कागदपत्रांची गरज असेल त्यास आम्ही सहकार्य करु असे पोलीस आणि शिवप्रेमींना सांगितले. पुतळा कोणत्याही परवानगीशिवाय बसविल्याने पोलीस उपनिरीक्षक समीरसिंह साळवे यांनी माझ्या अखत्यारीत असलेल्या भागात अशाप्रकारे घटना घडत असेल तर मी शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत दिला.
प्रशासनाला विनंती आहे आम्ही पुतळा बसविला आहे. पुढच्या काही दिवसात परवाने घेतले जातील. सार्वजनिक बांधकाम विभागाला कसला अडथळा नाही. गावाला अडथळा नाही. पोलीस प्रशासनाने आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही या दबावाला बळी पडणार नसून पुतळा असाच ठेवणार असल्याचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले. पुढच्या ४ दिवसात ग्रामसभा घेऊन बसविल्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचेही प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांनी सांगितले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवल्याने पट्टणकोडोली गावाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.