खानापूर घाटमाथ्यावर गेल्या चार दिवसांपासून वादळी वारा व विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या द्राक्षच्या बागांना मोठा फटका बसला आहे. परिणामी द्राक्षाच्या दरात घसरण झाली आहे. निर्यातक्षम द्राक्षबागांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर या वर्षीचा निर्यातक्षम द्राक्षबागांचा हंगाम जवळपास संपत आला आहे. मात्र देशांतर्गत पाठवल्या जाणाऱ्या द्राक्षबागातील द्राक्ष माल काढणे अजून शिल्लक आहे. घाटमाथ्यावरील पळशी, हिवरे, करंजे, बलवडी (खा), बेनापूर, सुलतानगादे या गावांमध्ये द्राक्षबागांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
ऑक्टोबर महिन्यात या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने या वर्षीचा द्राक्ष छाटणी हंगाम लांबला होता. याचा फटका द्राक्षबागांना बसला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी या परिसरामध्ये वातावरण स्वच्छ द्राक्षबागांच्या काढणीला गती आली होती. गेल्या आठवड्यामध्ये द्राक्षांचा दर चार किलोस २४० ते २५० रुपये असा होता, त्यामध्ये आता घसरण होऊन तो चार किलोस १८० रुपये असा झाला.