खानापूर तालुक्यात ग्रामीण भागात घरफोड्यांचा उच्छाद; लाखोंचा ऐवज लंपास

खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात चोरीची घटना वाढत आहेत. त्यात घरफोड्यांनी उच्छाद मांडला आहे. गुरुवारी एकाच रात्रीत गुंजी, करंबळ आणि देवलत्तीत बंद असलेल्या घरांना लक्ष देऊन दागिने व रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरी करण्यात आला आहे. कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविल्याचे दिसून आले आहे. आजूबाजूच्या घरांना बाहेरुन कडी लावून चोरट्यांनी चोरीचा प्रकार तडीस नेला आहे. देवलत्तीत एका सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. एका दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी घरफोडी केल्याचे दिसून आले आहे. करंबळमधील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याद्वारे चोरांचा माग काढण्याचे काम हाती घेतले आहे.

गुंजीतील 9, करंबळमधील 6 घरे व मंदिर आणि देवलत्तीत 4 घरात चोरीचा प्रकार घडला. गुंजीत उमेश तमुचे यांच्या तिजोरीतील 20 हजार रुपयांची रक्कम व साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोने व चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. राजाराम गुरव यांच्या घरात शिरुन तिजोरी फोडण्याचा प्रयत्न सुरु असताना नेमके गुरव गल्लीतील युवक बाळकृष्ण घाडी आपल्या शेतावरुन घराकडे येत होते. त्यांच्या गाडीचा आवाज ऐकताच चोरट्यांनी तेथून पलायन केले. बाळकृष्णने गल्लीतील रहिवासी रावजी बिर्जे, जयकुमार गुरव, संदीप घाडी यांना फोन करुन बोलावून घेतले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

त्याआधी चोरट्यांनी विनायक घाडी, महादेव करंबळकर, निलेश केशकामत, रमेश देसाई, तुकाराम घाडी यांच्या घरांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. पण, घरामध्ये त्यांना पैसे किंवा किंमती वस्तू सापडल्या नाहीत. देवलत्ती व करंबळ या ठिकाणीही कुलूप बंद घरांना लक्ष बनवून चोर्‍या करण्यात आल्या. पोलिस उपनिरीक्षक चन्नबसव बबली, शेशाप्पा कमकेरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन ठशांचे नमुने गोळा केले आहेत. पोलिसांनी तपास सुरु केला आहे