सांगोला तालुक्यातील २२१ हातपंप बंद आहेत. तापमान वाढल्यामुळे पाण्याची पातळी खाली जात आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी हातपंप कोरडे पडत आहेत. दरम्यान हंगामी ८ महिने सुरू असणारे हातपंप ही आता पाण्याअभावी कोरडे पडत आहेत. तर ५ कोटी २१ लाख रुपये विद्युत विभागाची थकबाकी असल्याने मागील आठ महिन्यापासून शिरभावी पाणीपुरवठा योजना बंद आहे. तालुक्यातील नदी, नाले, तलाव कोरडे ठणठणीत असून, उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने विहीर व बोअर च्या पाण्याच्या पातळ्याने तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सांगोला तालुक्याच्या ग्रामीण भागात १ हजार ०७७ हातपंप आहेत. त्यापैकी २२१ हातपंप पाण्याअभावी कायमस्वरूपी बंद आहेत. उर्वरित ८५६ हातपंप हंगामी सुरू राहतात. परंतु उन्हाचा चटका जाणवू लागल्यामुळे भूजल पातळीत घट झाल्याने हे हातपंप हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहेत. उन्हाळ्यात सांगोल्यात पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे काही ठिकाणी हातपंप बंद पडण्याची शक्यता असते. या काळात पाण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून ग्रामपंचायत किंवा संबंधित पाणी पुरवठा विभाग हातपंप तक्रारी प्राप्त होताच दुरुस्तीची कामे करत आहेत. परंतु आता पाण्याच्या पातळीने तळ घातल्यामुळे हात पंप कोरडे पडत आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी पाणीटंचाई बाबत कोणताही अर्ज प्राप्त झालेला नाही परंतु येत्या काळात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.