इचलकरंजी येथे शुक्रवार पासून घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारले होते. हे कामबंद आता आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता आजपासून म्हणजेच गुरूवार, ता. १० पासून कचरा उठावाचे काम सुरू होणार असल्याचे महानगरपालिकेने प्रसिध्दीस दिले आहे. महानगरपालिका आरोग्य विभागातील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा उठावाचे काम करणाऱ्या जवळपास ९४ कर्मचाऱ्यांनी याकामी नियुक्त करण्यात आली होती. मक्तेदार यांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या दिवसाचे वेतन कपात केले होते त्या मक्तेदार कंपनी विरोधात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती पुणे विभाग यांचे नेतृत्वाखालीत ५ एप्रिल पासून संप सुरू केलेला होता.
या संपाशी महानगरपालिका प्रशासनाचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याने आणि या संपामुळे स्वच्छतेबाबत संपूर्ण शहर वेठीस धरले गेल्याचे निदर्शनास आलेने तसेच आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी संबंधित मक्तेदार कंपनी आणि संपामध्ये सहभागी होवून शहरास वेठीस धरलेल्या घंटागाडी कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करणेचे निर्देश दिले होते. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे निर्देशाचे अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त अशोक कुंभार यांनी या प्रकरणी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, धंनजय पळसुले, आकाश माने, सहा. आयुक्त विजय राजापुरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार आणि घंटागाडी कर्मचारी प्रतिनिधी यांचे सोबत बैठक झाली.
या बैठकीत सुट्टीचा पगार चार दिवसात देण्याचा निर्णयाबरोबर इतर मागण्यावर चर्चा होऊन घंटागाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. तसेच उद्या गुरुवार दि. १० एप्रिल पासून पूर्ण सुरू करण्याचे मान्य केले.