खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे शिकलगार समाजाचे अधिवेशन मोठ्या उत्साहात पडले पार

खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे पीर लाल शाहबाज कलंदर यांचा उरूस महोत्सव चालू आहे. या उरूसानिमित्त शिकलगार समाजाचे अधिवेशन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नौशाद शिकलगार हे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, समाज एकत्रित आला तर प्रगती निश्चित होते, हे शिकलगार समाजाने सिध्द केले आहे, शिकलगार समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेचे प्रमाण वाढत असून तसेच विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे ही आमच्यासाठी गर्वाची बाब असून, कै. याकूब बाबा, कै. मकबूल आबा, रसूल मास्तर, रज्जाक गुरुजी यांनी रचलेल्या संघटनेच्या पायाला कळस बसवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करत असल्याचे सांगितले.

फिरोज शेख म्हणाले, हा समाज मेहनतीने पुढे आला असून, समाजाची समाजाप्रती असणारी निष्ठा व समाजामध्ये असणारी एकसंघता संघटनेची बांधणी व विद्यार्थ्याप्रती असणारी शैक्षणिक दृष्टी संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांची वाखाणण्याजोगी असून, त्यांच्या या प्रयत्नांना याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात समाजाने पाठिंबा देण्याची गरज आहे. जिल्हाध्यक्ष याकूब शिकलगार यांनी याकूबबाबा यांचे जीवनावर संघटनेसाठी असलेले कार्य याची माहिती देऊन त्यांचे जीवनचरित्र यावर पुस्तिका लिहिणार असल्याचे सांगितले, संघटनेचे सचिव चंदू शिकलगार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह विविध स्पर्धा परीक्षा याचे मार्गदर्शन संघटनेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.

यावेळी पीएसआय सलीम शिकलगार, नाविकाधिकारी समीर शिकलगार, गणि शिकलगार यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी दहावी व बारावीच्या २५ हून अधिक विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन  तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य कमावलेल्या उच्चपदस्थ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुस्लिम समाज लेंगरे, ग्रामपंचायत लेंगरे, सांगली जिल्हा मुस्लिम शिकलगार समाजाने नेटके नियोजन केले. दोस्ती ग्रुप विटा यांच्यावतीने भोजनाची व्यवस्था केली. जमात ट्रस्ट, व युवा संघटना मुंबई यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.