जवळा व घेरडी मंडल मध्य अतिवृष्टी झाल्यामुळे फळ व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हातात तोंडाला आलेली फळ पिके व शेती पिकात गुडघाभर पाणी साचून आहे. यामध्ये शेतकऱ्याचे न भरून येणारे नुकसान आहे. सगळीकडे पाणीच पाणी असल्याने शेतात पाऊल ठेवायला येत नसल्यामुळे येथे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. त्यानुसार घेरडी व जवळा मंडल मधील नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत अशी आग्रही मागणी मा. सरपंच दिलीप मोटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी लावून धरली.
सांगोला तालुक्यात सर्वच मंडल मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे फळ व शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे सर्व नाले ओढे तलाव व नदी पाण्याने भरून वाहत आहेत. यामध्ये जवळा व घेरडी मंडल मधील घेरडी, पारे, हंगेरगे, नराळे, डिकसळ, हबीसेवाडी, गावडेवाडी यासह जवळा आणि इतर गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात गुडघ्या एवढे पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांची उभी पिके यामध्ये डाळिंब, मका, ऊस, बाजरी, तूर, कांदा इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र असणे बंधनकारक असताना घेरडी मंडल मध्ये पर्जन्मपक यंत्र नाही तरी शेताच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करून आपल्या स्तरावर जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांनी लेखी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली. याबाबत वारंवार वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्धी करत, परिस्थितीचा आढावा वेळोवेळी देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान काल सोमवारी कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा निवेदन देवून शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत प्रशासनाची लक्ष वेधून घेतले. निवेदन देतेवेळी संतोष पाटील, बाळासो गळवे, सर्जेराव गायकवाड, चारुदत्त सूर्यवंशी, शिवाजी वगरे, सुरेश बुरुंगले, विवेकानंद टेकाळे, रामचंद्र उत्तरे, परमेश्वर गेजगे त्यांच्यासह महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
