राज्याच्या विविध भागांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत प्रवेश प्रक्रिया राबविता आली नाही. याची दखल घेत राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षाने विधी, बीएड-एमएड, बीपीएड, एमपीएड आणि एमएड या अभ्यासक्रमांच्या वाढीव संस्थात्मक फेरीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी बारावी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षांचे गुण भरण्यात चूक केली आहे, त्यांनाही अर्जात दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सीईटी कक्षातर्फे संस्थात्मक स्तरावरील फेरीसाठी प्रवेश अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेशासाठीची वाढीव फेरी दि. ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान राबविणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी मिळणार आहे.
या राज्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती व इतर तांत्रिक कारणामुळे अनेक विद्यार्थी विधी, बीपीएड, एमपीएड, एमएड व बीएड-एमएड अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ शकले नाहीत या सर्व विद्यार्थ्यांना ही एक संधी देऊ केली आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.
