२ हजार किमीचा सायकल प्रवास करत मानस अयोध्येत दाखल…

अब्दुल लाट (ता-शिरोळ) येथील मानस महावीर बिंदगे याने १७ दिवसांत २ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करत प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येत प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी दाखल झाला आहे.अब्दुल लाट येथील मानस महावीर बिंदगे (वय २२) या तरुणाने स्वतःच्या जिद्दीवर जयसिंगपूर (ता-शिरोळ) येथून कोणताही गाजावाजा न-करता अयोध्येचा प्रवास सुरू केला. २ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास १७ दिवसांत पूर्ण करत अयोध्येत तो दाखल झाला आहे.

श्रीरामाची भक्ती व जिद्द यामुळे त्याने हा एकट्याने प्रवास पूर्ण केला आहे. जयसिंगपूर पासून सांगोला, तुळजापूर, नांदेड, नागपूर, रामटेक, जबलपूर, कटनी, महैर, रीवा, प्रयागराज, वाराणसी, जौनपूर असा प्रवास करत तो अयोध्येत पोचला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यातून त्याला मदत मिळाली.

तेथील लोकांच्याकडून राहण्याची व जेवणाची सोय चांगल्या पद्धतीने करण्यात आली होती. त्याचे अनेक ठिकाणी जयश्रीरामाच्या घोषणा देत स्वागत करण्यात आले.सर्वांचा आशीर्वाद व कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळे व प्रेरणेमुळे हा धाडसी प्रवास पूर्ण करत असल्याचे त्याने फोनद्वारे सांगितले.