स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पाठपुराव्यास यश!

स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी अनेक गावातील वंचित क्षेत्रासाठी टेंभू योजनेचे पाणी मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आलेले आहे म्हणजे टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक पाच वरून भुड देवीखिंडी वितरेकेवरून घरणीकी गावासाठी आणि गोरेवाडी डाव्या कालव्यावरून वलवन, चिंचाळे, आवटेवाडी, धावडवाडी खरसुंडी या गावातील वंचित क्षेत्रासाठी टेंभू योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग हा सुखर झालेला आहे.

यावेळेस युवानेते सुहासभैय्या बाबर माहिती देताना म्हणाले की टेंभू योजनेच्या भुड देवीखिंडी वितरेकेवरून घरनिकी गावासाठी आणि गोरेवाडी डाव्या कालव्यावरून वलवन, चिंचाळे, आवटेवाडी, धाबडवाडी, खरसुंडी या गावातील वंचित क्षेत्रासाठी टेंभूचे पाणी मिळावे यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर प्रयत्नशील होते.

टेंभू योजनेचा घाणंद, हिवतड कालवा, घरनिकी वलवन, चिंचाळे, आवटेवाडी, धावडवाडी, खरसुंडी या गावांच्या खालून जात होता त्यामुळे या गावातील कालव्याच्या वरील भाग गावे टेंभूच्या पाण्यापासून वंचित राहत होती. या गावाच्या वंचित क्षेत्राला वरच्या भागाला पाणी देताना वन विभागाच्या जमिनीचा मुख्य अडसर होता.

याबाबत स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी जलसंपदा विभागास वारंवार पाठपुरावा करून या कामाची परवानगी घेतली होती. दरम्यानच्या काळात भाऊंचे निधन झाले. या कामाची दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी निविदा प्रसिद्ध झाली. या कामाची वनविभागाची दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी परवानगी मिळाली होती परंतु वन विभागाची जलसंपदा विभागात प्रत्यक्षात मार्च महिन्यात परवानगी मिळाली.